Saturday, May 12, 2012

मन घडवणारे प्रसंग -- शोधावे लागेल

मन घडवणारे प्रसंग
अंतर्नाद

तरच पाऊस पडेल

तरच पाऊस पडेल
सकाळ रविवार दि. (95-96)
                                                                       तरच पाऊस पडेल
                                       - अनिता अग्निहोत्री
                               -  अनुवाद - लीना मेहेंदळे
ओरिसा हे देशातील अत्यंत दुष्काळी राज्य मानले जाते. श्रीमती अनिता अग्निहोत्री या तेथे भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. ओरिसातील कलाहंडी, ढेंकनाल, कटक इत्यादी जिल्हांत तीव्र दुष्काळाच्या काळातही त्यांनी वेगवेगळ्या शासकीय पदावर काम केले आहे. श्रीमती अग्निहोत्री या बंगाली भाषेतील नामवंत कवयित्री असून, त्यांनी टिपलेला ओरिसातील हा दुष्काळ.

सकाळभर हुंदडून
बाळ अनुष्टुभ झोपलाय !
पण मी ?
भर पाऊस - काळातल्या
या रणरणीत दुपारीच
ओझं शिरावर घेऊन
बसलेय
लिहित्येत !


खिडकीबाहेर
धगधगलेलं, श्रांत..क्लांत..
दोलाशाही मैदान
आठवडा बाजाराचा दिवस असूनही निर्जन !
सूर्यानं तो जनसागर
शोषून घेतला आहे !


मनाचेच ठाव घेत्येय
पलीकडील काठजोडीच्या
गढूळ पाण्यावर झुकलेली दुपार..
पाण्यात कुणाचं दीनवान उपाशी बिंब बघताना
दरगा बाजाराची गल्ली उठली...
ते प्रतिबिंब गुंडाळून ठेवण्यासाठी...
शेवरीच्या म्हाताऱ्या उडताहेत.
मेघाची वाट पाहून थकलाभागला चालक
त्यांच्याच पाठी लागतोय,
त्यांना उडवून लावतोय..
 तहानव्याकुळ कावळ्याला तेही त्रास नाही !
.. येऊन बसला माझ्या छपराच्या कपारीत..


अन्नूच्या मखमली पापण्याखाली
स्वप्न तरंगताहेत
गालाच्या खळीतून खुद्कन ओघळताहेत
ओठ...
जणू ओथंबलेले ढगच !
चकचकीत निळ्या पंखांचा एक वेडा चतूर
दुर्वा समजून त्यावर येऊन बसला


भासानपोतच्या
तडकलेल्या जमिमीतून
झेपावत लांब गेलेले रूळ
त्यांच्या दोन्ही कडेनं
साचून राहणारं
रेल्वेचंच पाणी..
आज तेही सुकलंय !
पण अन्नू,
तुझ्याकडे बघताना
मला कल्पनेतच त्यावर दुर्वा डोलतावना दिसतात..
त्याच तडाकलेल्या जमिनीतून
मृव्दंधाचे लोट माझ्या पायांना वेढा घालतात..
पंख फुटलेल्या लक्ष लक्ष मुंग्या
त्या गंधाच्या स्वागतासाठी बाहेर येतात....


हे सत्यात अवतरू दे
बाजरीच पीक नाचू दे
बाप्पा पावसा,
ये !
मदनपूरच्या बाजारात कधीच येऊ लागतील
कालाहंडीच्या एकेका गावातील
गरिबाघरची भांडीकुंडी
सुंदरच्या कोरड्या पात्रावर
झेपावू लागली गिधाडं...
अन् खाली वाळूत
मेल्या गुराढोरांची लक्तरं !


मरेलीया, जर्जर शरीरं आणि मन
धाडस करून उठली
पंजाबात शेतमजुरी करण्यासाठी !
त्यांच्या वयात आलेल्या मुलीला
गावपाटील आणि सावकाराचं
आज रात्रीच निमंत्रण आहे

तिकडे बांबूच्या बनावर शतसहस्त्र फुलं फुलली
अमंगलसूचक...


पाऊस येत नही भासानपोतचं मैदान ओलांडून
आम्ही चढतो तिथल्या डोंगरावर
गुडघे टेकतो, करूणा भागतो...
इतकं उंचावर येऊनही तुला दिसत नाही ?
म्हणून झाले
सगळे मंत्र, सगळ्या आरत्या...

त्या तू ऐकत नाहीस ?

जातीपाती विसरलो
सगली आलो
लोभी व्यापारी
धास्तावलेला चाकरीमानी,
ठेकेदार, इंजिनिअर,
संन्यासी...
तू का येत नाहीस ?

पावसासाठी नेला मग
एक बोकड
फुलं, गंध, उधळून
 वाजतगाजत
ओढतताणत..
मंदीराच्या पटांगणात
शिपडला त्याच्या रक्ताचा सडा
तेच रक्त सर्वांनी माखून घेतलं
अंगभर..
आतातरी पावसा ये...

पण पाऊस येत नाही

तिथून मनाला परतावू
 पुन्हा तुझ्याजवळ येऊन बसल्येय
अन्नू,
तुझ्या डोळ्यांत दिसतात मला
जलभरित मेघ
तुझ्याच गालाच्या खळीतून निघतो
 मातीचा नवा गंध !
तुझ्या मेणमृदूल मुठीत आता
लपवून ठेव सुर्याला !
वाफेला चुंबून घे !
तिला घनाकार दे !
..तिचे ढग बरसण्यासाठीच मग खाली येतील..
तूच आता हाकार दे !
तुझ्या ओठांच्या, मनाच्या
निरागसतेचा स्पर्श दे !
तरच ते ढग बरसतील;
तरच ते ढग बरसतील !
---xxx---